बिबट – न घर का, न घाट का….!

” जेव्हा एका माणसावर,
बिबटाने केला हल्ला,
जोर जोराने गावात त्या,
करू लागले लोक कल्ला…!

बिबट म्हणाला याअगोदर,
गावात तुमच्या आलो काय,
तुम्ही तोडले सारे जंगल,
आता नाही मला उपाय…!”

कवी वामन फंड यांच्या ह्या ओळी बरच काही बोलून जातात. कारण मानव आणि वन्यजीव संघर्ष हा एक ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालाय. वाघ, बिबट, अस्वल या सारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात मानव दगावल्याच्या घटना आपण बघतोच आहे. तर दुसरीकडे वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांची शिकारही मनुष्यप्राणी करतांनाही आपल्याला आढळत आहे. या अस्तित्वाच्या लढाईत मात्र मुक्या जीवांच्या वाटेला कायमच उपेक्षा येते. हे वन्यजीवांची दुर्दैव नाकारून चालणार नाही.  खर तर निसर्गाने सजीवांची निर्मिती केली, त्या अर्थाने प्रत्येक सजीवाचे आपले स्वतंत्र महत्व आहे. निसर्गातील अन्नजाळे व संपूर्ण अन्नसाखळीकडे आपण निरखून पाहिल्यास आपल्याला याची प्रचीती येईल. जंगल म्हणजे केवळ वाघ इतका संकुचित विचार करून चालणार नाही. मात्र आज जंगल आणि वाघ असचं समीकरण आज आपल्या समाजमनात रूढ झालंय. खर तर वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्नसाखळी आणि या साखळीतला प्रत्येक सजीव महत्वाचा आहे. व्याघ्र केंद्रित मानसिकतेत आजच्या घडीला अनेक सजीव झाकाळल्या गेले आहे. हे एक कटू सत्य आहे. व्याघ्र केंद्रित वन्यजीव विभाग, वन्यजीव संस्था, पर्यटन व्यावसयिक आणि पर्यटक या सगळ्या लव्याजम्यात इतर वन्यप्राण्यांना फारसे स्थान नसल्याच चित्र आहे. वाघांच्या संवर्धनाबरोबर इतरही प्राण्यांचही संवर्धन होते या तर्काला काही मर्यादा आहेत. केवळ व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत आपण काही अंशी हे खरआहे अस समजू शकतो. मात्र व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त इतर जंगलात असलेल्या ३० ते ३५% वाघ आणि इतर वन्यजीव राहतात. येथील वाघ आणि वन्यप्राणी सुरक्षित आहेत का? वाघांचे वाढते मृत्यू आणि वाढता मानव वन्यजीव संघर्षांची आकडेवारी यातून हे स्पष्ट होईल. खर म्हणजे यात वन्यप्राणी आणि मानव हे दोघेही अडचणीत आले आहे. जिथे मानवाचा आणि वाघांच्या जीवाची खात्री आपण देऊ शकत नाही तिथे बाकी वन्यप्राण्यांचा काय थांग लागणार..! शहरांचा वाढता आकार, ग्रामीण भागाचे वनाबरोबर असलेले सहजीवनाची भूमीका लोप पावली असतांना अश्या व्याघ्रकेंद्रित व्यवस्थेत इतर प्राण्यांना थाराच नसल्याच चित्र आहे. भारतातील बिबळ्यांची आज हीच अवस्था झाली आहे. सध्यस्थितीत बिबळ्या या व्यवस्थेतचा बळी ठरतो आहे असच म्हणावं लागेल. कारण बिबळ्यांच्या वाढत्या मृत्यूंचे प्रमाण आणि त्यांची आकडेवारी मनाला सुन्न करणारी आहे.

बिबट आणि मानव संघर्ष वनविभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी वस्त्या व मानवाचा जंगलामध्ये वाढता वावर व अतिक्रमणामुळे माणसांवर बीबट हल्याची संख्याही वाढत आहे. तर दुसरीकडे सन २०१८ व २०१९ या गेल्या दोन वर्षात भारतात एकूण ८८६ बिबट मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. सन १९९८ मध्ये भारतात बिबट्यांची संख्या अंदाजे ४५,००० इतकी होती, मात्र सन २०१५ मध्ये केवळ ७,९१० इतकेच बिबट शिल्लक राहिल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिद्ध झालंय. गेल्या १७ वर्षात बिबट्यांच्या संख्येत सुमारे ८२% इतकी घट झाली आहे.

बिबट्याने मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी अनुकूलन साधल हे तंतोतंत खर आहे. कारण मुंबई, नाशिक व इतरही विभागात सहज बिबट्यांच्या वावर आपल्याला दिसून येतो. नाशिक विभागात तर बिबट्यांचा जुना अधिवास संपल्यामुळे पर्याय म्हणून बिबट्याने चक्क उसाच्या शेतात आपले बस्तान मांडले आहे. प्रजनन करण्यापासून ते थेट शिकार करण्यासाठी सगळ्या गोष्टी बिबट उसांच्या मळ्यात करायला लागलाय. मागील वर्षी अकोला जिल्ह्यात कालव्यात पडून बिबट मृत पावल्याची घटनाही याचच उदाहरण आहे. मानवी सहजीवनात बिबट्या रमला असला तरी मानवी हल्ल्यांमध्ये वाघांच्या तुलनेत बिबट्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. कारण बिबट्याची मानसिकता जाणून घेणारे कुठलंच तंत्रज्ञान आजवर विकसित झालेल नाही. बिबळ्याच्या नैसर्गिक राहणीमानवर फरक पडला की त्याचा फटका आपल्यालाही बसणारच हे मात्र निश्चित आहे. कारण बिबळ्या निवांत झोपणे, शिकार करणे, शिकार केल्यानंतर निवांत खात बसने, आळस देण्यापासून त्यांची संपूर्ण दिनचर्या मनुष्यवावरामुळे प्रभावित झाली आहे. म्हणूनच हल्यांच्याही घटना वाढल्या आहेत. मात्र बिबट्यांचा स्वभाव माणसाला मारणे नसून त्याला टाळणे आहे. सेल्फ प्रोटेक्शन हा प्रत्येकाचा सजीवाचा स्वभाव आहे. त्यामुळं बिबट सुद्धा स्वरक्षणासाठी हल्ला करतात हे एक वास्तव आहे, जे आपण समजून घेत नाही.

एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी आज अनेक प्रयत्न केले जातात. वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. आज भारतात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र तेच बिबटयाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी  कुठलीच विशेष यंत्रणा देखील नाही. त्यामुळे गेल्या २० वर्षात बिबट्यांची संख्या प्रचंड कमी झालीय. बिबट्याची अनुकूल क्षमता भरपूर असूनही आज त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बिबट्यांच खाद्य जरी हरीण, रानडुक्कर व तत्सम प्राणी असले तरी तो प्रसंगी पक्षी खाऊन, कुत्रे खाऊन जगतो. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत तो आपली गुजराण करण्यास समर्थ आहे.

सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४६० बिबट मृत पावले आहेत. यात एकूण ९० शिकारीचे प्रकरने उघडकीस आले, तर २२ बिबट्यांना चक्क गावकऱ्यांनी यमसदनी पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित मृत्यूबाबत मात्र अजूनही कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तब्बल ९० बिबट्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यामध्ये हरियाना नंतर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. सन २०१५-२०१६ मध्ये केंद्र सरकारने भारतातील २१ राज्यातील व्याघ्र संवर्धनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये निधी दिला. धक्कादायक म्हणजे यामध्ये बिबट व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी एकही रुपया खर्च केल्या गेला नसल्याचे एका अहवालातून निष्पन्न झाले आहे. वाढती शिकार, संवर्धनात असलेले दुय्यम स्थान पाहता बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाघ आणि बिबळ्यांच्या मृत्युच्या आकडेवारीची तुलना केल्यास वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण दोनशे पटीहून अधिक आहे. ज्या जंगलात वाघ नाहीत अश्या वाघ नसलेल्या परिसंस्थेत व अन्नसाखळीत बिबट प्राणी शिखर प्रजातीची भूमिका पार पाडतो. मात्र काही मोजक्या जिल्ह्यातील वन व्यवस्थापन वगळता इतर ठिकाणी बिबट संवर्धनाच्या दृष्टीने फारस गंभीर नसल्याच चित्र आहे. अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड राखीव जंगल यासाठी उत्तम उदाहरण म्हणता येईल. कारण आजवर येथे बिबळ्यांचा हल्यात मानवाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची नोंद नाही.  अश्या प्रकारचे वन्यजीव व्यवस्थापन इतरही ठिकाणी होणे आवश्यक आहे.

रानडुक्कर आणि काळवीट बिबट्याचे आवडते खाद्य आहे. शेतकऱ्यांना रानडुक्कर, हरिण व निलगायींच्या त्रासापासून वाचायचे असेल तर त्यांनी बिबट संवर्धनात वन विभागाला सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. सुमारे १५ ते २० वर्षापूर्वी वन्यप्राण्यांनी शेतपिक नुकसान करण्याइतका हा प्रश्न भयंकर चिघळलेला नव्हता, याच कारण एकच की वन्यप्राण्यांचे  अधिवास आम्ही संपवले, त्यांना लागणार खाद्यही आम्ही पळविल, इतकंच काय तर त्यांच्या हक्काच्या अधिवासावर वन अतिक्रमण करून आम्ही त्यांची हक्काची जागा सुद्धा बळकावली. बिबट व इतर वन्यप्राण्यांची प्राणवायू, पाणी आणि अन्न या व्यातिरिक्त तिसरी गरज नाही. हे सगळं त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात पूर्वी  सहज उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रश्नच नव्हता. मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांच्या अधिवासात मानवाने केलेली प्रचंड ढवळाढवळ याला कारणीभूत ठरली आहे. आज समंध बिबटांची दशा अशी झाली आहे की, जंगलात खायला अन्न नाही आणि गावाकडे आला तर मानवाची आरडाओरडा….! म्हणजेच बिबट्या हा ‘ न घर का, न घाट का और दुश्मन अनाज का’ अशीच अवस्था त्याची झाली आहे. एकीकडे बिबट्यांच्या अधिवासात केलेला हस्तक्षेप मानवाच्या जीवावर बेतत आहे. तर दुसरीकडे केवळ आपलं जीवनच धोक्यात आलं नाही तर शेतीही धोक्यात आली आहे. म्हणूनच आता तरी बिबट्यांच्या नखभर राहिलेल्या अधिवासात आम्ही आपली धुडगूस थांबवून आपलंच संवर्धन करुया. अवैध वृक्षतोड, गुरेचराई, वन जीमिनिवरील अतिक्रमन, विकास प्रकल्प आदी थांबवून बिबट्यांना त्यांच्या अधिवासात मोकळा श्वास घेऊ देऊया. म्हणजेच बिबट्यांना गाव किंवा शहराकडे फिरकण्याची आवश्यकता भासणारच नाही. यातच आपले हित आहे.

@ यादव तरटे पाटील

     वन्यजीव अभ्यासक,

     दिशा फाउंडेशन, अमरावती

    disha.wildlife@gmail.com

     www.yadavtartepatil.com

 

16 thoughts on “बिबट – न घर का, न घाट का….!”

  1. खूपच छान आणी वास्तवदर्शी लिखाण….. Keep it up

    1. दादा खूप खूप आभार आणि तुमच्या फोटोने खूप जास्त मजा आली.
      काही माणस हक्काची असतात जसे तुम्ही आणि बावणे सर.
      धन्यवाद

  2. खूपच बोलका लेख। वाचल्यावर नक्कीच प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे। सत्य नेहमीच कडू असते यात शंकाच नाही म्हणून वास्तव पुढे आणायचेच नाही म्हणुन आपले मत द्यायचेच नाही व बघ्याची भूमिका घ्यायची व मला काय त्याचे म्हणून बसून रहायचे यात काहीच अर्थ नाही।
    आज हा संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे। वन्यप्राणी पराधीन झाले आहेत, आपल्याच घरात अनाथ झाले आहेत।
    बरे फिर्याद तरी कोणाकडे करायची। सवत्र स्वार्थ आहे। पाहिले डोळे मिटल्यावर गुन्हे व्हायचे आता तर डोळ्यासमोरच गुन्हे घडतात। समाज आंधळा झाला की ढोंगी झाला हेच समजत नाही।

    सरतेशेवटी हेच म्हणेल की This is fight for space which originally belongs to forest n wildlife
    Dr. A. D. Kholkute

    1. आदरणीय प्रिय खोल कुटे सर
      आपण दिलेली पाठीवरची कौतुकाची थाप मला प्रचंड उर्जा देणारी आहे. खूप आनंद होतोय सर.
      आपण केलेल्या अमूल्य मार्गदर्शन आणि शुभेच्छा साठी आभारी आहे.
      असच मार्गदर्शन करत राहावे ही विंनती

  3. सर नमस्कार,
    मी आपले लेख नियमित वाचतो.अभ्यासपूर्ण लेख.प्रत्येकाने निसर्ग साक्षर व्हावं ,ती काळाची गरज आहे. वाघाचे सवर्धना सोबत ईतर प्राण्यांचे सावर्धन कडे शासनाचे लक्ष वेधले जावे हिच सदिच्छा

    1. नमस्कार
      खूप खूप धन्यवाद सर
      आपली इच्छा नक्की पूर्ण होईल. मी याबाबत पाठपुरावा करतोय. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  4. वस्तुनिष्ठ अन वास्तव वादी लिखाण म्हणता येईल..बिबट्याच्या एकंदरीत हक्काच्या राहणीमान व अधिवास यावर मानवाने केलेल्या अतिक्रमनामुळे त्या बापड्या बिबट्या वर कशी परीस्थिती ओढवलीय याच सुंदर लिखाण केलय..
    अभिनंदन?

    1. आदरणीय कडू सर
      खूप खूप आभार आणि धन्यवाद, आपली कौतुकाची आणि शाब्बासकीची थाप नेहमी उर्जा देते.

  5. Nice article. Needs to be circulated amongst farmers, to change perception…………..

    1. Thank you Sir
      Yes need to be circulate. I am preparing one poster for it. it will display in villages. Thank you for your valuable input.

  6. वन्यजीव मानव संघर्ष याबाबत वास्तव लिखाण हे कामाप्रती असलेला लळा दर्शवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *