वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५% लोकसंख्या तरुण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंखेच्या तब्बल ५८% लोकसंख्या तरुण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात तरुणांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. तरुणांच्या हाती केवळ त्या त्या देशांच भविष्यच नसून जगभरातील सर्व वन्यजीवांच भविष्यचं खऱ्या अर्थाने त्यांच्या हाती आहे. गेल्या ४० वर्षात जगाभरातील अर्धे अधिक वन्यजीवन धोक्यात आले आहे. अधिवास धोक्यात येणे, वन्यजीव शिकार, वन्यप्राणी तस्करी, अधिवास विखंडन अश्या अनेक अंगाने त्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. याची आकडे इतके बोलके आहेत कि केवळ हस्ती दंतासाठी आजवर १,००,००० आफ्रिकन हत्ती (African Elephant) शिकार झालेत. इतकच काय तर खवले मांजर (Pangolin) हा जगात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी ठरला आहे. गेल्या १० वर्षात गेंड्याच्या शिकारीत ९ हजार टक्क्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाघांच्याही बाबतीत चित्र असच आहे. या शतकाच्या सुरवातीला जगात एक लाख तर भारतात अंदाजे चाळीस हजार वाघ असल्याची नोंद आहे. मात्र सध्या ही संख्या केवळ जगाच्या बाबतीत चार हजार व भारताच्या बाबतीत फक्त काही हजारावर आली आहे. जैवविविधतेतील इतर प्राण्यांच्या बाबतीत नं बोललेलच बरे. कारण फक्त मोठ्या प्राण्यांच्याच बाबतीत आम्ही नेमकी आकडेवारी सांगण्यात यश मिळऊ शकलो आहे. कोल्हे, लांडगेच नव्हे तर जैवविविधतेतील इतर अत्यंत महत्वाचे प्राणी व गिधाड, माळढोक सारखे निवडक पक्षी वगळता इतर पक्षी यांच्याबाबत अजूनही नेमके आकडे सांगण्यात आम्हाला मर्यादा आहेत.

दि.३ मार्च १९७३ ला ‘कन्वेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड ईन एंडेजरड स्पेसिज ऑफ वाईल्ड फ्लोरा अन्ड फाऊना (CITES) हा आंतरराष्ट्रीय करारावर जगभरातील सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या धर्तीवर सन २०१३ पासून या कराराच्या अनुषंगाने हा दिन साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या म्हणजे २०२१ च्या ‘वन आणि उपजीविका: जन व वनाची शाश्वत व्यवस्था’ ही जागतिक वन्यजीव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.जंगले अनेक समुदायांना, विशेषत: देशी व स्थानिक समुदायाला जीवनदान देतात या विषयाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे उद्दीष्ट आहे. वन, वन्यजीवन व वन्यजीव प्रजाती, परिसंस्था सेवा आणि लोक, विशेषत: स्थानिक लोक जे सध्या वन-जमीनीच्या सुमारे २८ टक्के क्षेत्राचे व्यवस्थापन करतात. जागतिक वन्यजीव दिवसाचे ध्येय यातून अधोरेखित होते. गेल्या काही वर्षात युनो सारखे संघटन ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र अजूनही भारत सारख्या देशात या बाबत पाहिजे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीये. अजूनही खेड्यापाड्यातील आमचा नागरिक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन या विषयापासून कोसो दूर आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वन्यजीव संख्या झपाट्याने कमी झाल्याच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच परिस्थिती फारच वाईट आहे. सगळं काही अनाकलनीय आहे. विनाशाचा वेग अन संवर्धन करण्याचा वेग याचे प्रमाण व्यस्त आहे. म्हणून जागतिक व स्थानिक स्तरावरील प्राधान्यक्रमाचा व चिंतेचा विषय आहे. गेल्या दशकातील केवळ दोन वर्षाची आकडेवारी जर आपण पहिली तर आपल्या सामोरील चित्र अगदी स्पष्ट होईल. वात्सव किती भयाण असू शकते हेच या आकडेवारीतून दिसून येते. आय.यु.सी.एन. संस्थेची ही आकडेवारी अतिशय बोलकी आहे. सन २०११ ते २०१२ या केवळ दोनच वर्षात खालीलप्रमाने झपाट्याने संक्या कमी झाली आहे.

आय.यु.सी.एन.श्रेणी २०११ २०१२ नामशेष झालेले प्राण्याच्या संख्येत वाढ
नामशेष प्राणी ७९७ ८०१
अति धोकाग्रस्त ३८०१ ४९४७ १४६
धोकाग्रस्त ५५६६ ५७६६ २००
असुरक्षित ९८९८ १०१०४ २०६
धोक्याचा पातळीवर ४२७३ ४४६७ १९४

वरील आकडेवारी पाहता आपल्याला याची तीव्रता समजली असेलच. म्हणूनच वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याचे दृष्टीने जगभरात अनेक ठिकाणी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी जागितक वन्यजीव दिन व इतर दिन साजरा केला केले जातात. २०१७ या वर्षींच जागतिक वन्यजीव दिन हा विशेषतः तरुणांना सोबत घेऊन साजरा करण्याचे जागतिक पातळीवर ठरविण्यात आले आहे होते. ‘तरुणाईची हाक ऐका’ (LISTEN TO THE YOUNG VOICE) या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून २०१७ या वर्षीचा जागतिक वन्यजीव दिन साजरा केला गेला. यातून जगभरातील तरुण पिढी वन्यजीव संवर्धन साठी एकत्र करण्याचा युनो (United Nations of Organization)  चा मानस आहे. युनो (UNO) या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत न्यूयॉर्क मधील मुख्यालयात सुद्धा हा दिवस साजरा करण्यात आला होता. प्रत्तेक देशातील स्थानिक तरुणांना वन्यजीव संवर्धनासाठी एकत्रित करून जगभर सक्रीय व तरुण नेतृत्व उभे करण्याचा माणस या दिनामागचा होता.

वन्यजीवांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी झाली आहे. वन्यजीव व पर्यावरण संवर्धन तरुणांच्या पुढाकाराशिवाय करणे अशक्य आहे. शिकार प्रतिबंधक मोहीम असो कि वन्यजीव संवर्धन यात मोजकीच तरुण पिढी जोमाने काम करताना दिसत आहे. आणखी मोठ्या संखेने तरुण पुढे येण्याची गरज आहे. तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर वन्यजीव व पर्यावरण संवर्धन यासाठी प्रभावी कामकाज करणे गरजेचे आहे. तरुण पिढी यात मागे नाहीच, पण मुळात दुर्दैव हेच कि तरुणांची संख्या अत्यल्प आहे. प्रत्येक शहरात काही मोजकीच तरुण मंडळी हे काम करताना दिसतात. प्राणी, पक्षी व वन्यजीव शिकार, वन्यप्राण्यांची खरेदी विक्री होत असेल तर नागरिकांनी वनविभागाला व स्वयंसेवी संस्थाना माहिती द्यावी. आपण आपला खारीचा वाटा जरी उचलला तरी अनेक अंगाने या चळवळीला अर्थ येईल असेच वाटते. मात्र आज खरी गरज आहे ती आणखी तरुण रक्ताची. वन्यजीव संवर्धनाची क्रांती ही आम्हाला तरुण पिढीलाच हाताशी धरून करणे क्रमप्राप्त आहे.

© यादव तरटे पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
संपर्क- ९७३०९००५००
Email- disha.wildlife@gmail.com

6 thoughts on “तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!”

  1. प्रथम जागतिक वन्यजीव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
    वन्यजीवांचे संरक्षण या विषयावर लोकजागृती करणे आवश्यक आहे.. प्रत्येक व्यक्तीला वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी शपथ दिली पाहिजे… प्रत्येक व्यक्तीच्या राशीचक्र नुसार प्रत्येक राशीला एक प्राणी दिलेला दिसतो…. कदाचित त्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या माणसाला दिली असेल….जो माणूस आज विसरलेला दिसतोय….

  2. वन्यजीव संवर्धन काळाची गरज असून प्रचंड जनजागृतीची गरज आहे प्रत्येक शाळा काॕलेजमधून नियोजनपूर्वक प्रबोधन होने गरजेचे आहे. प्रत्येक वर्गाच्या पाठ्यपुस्तकात वन्यजीव यावर आधारीत धडा असायला हवा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *