अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर

निसर्गवेडे सृजनशील असतात. हिरव्या डोळ्यातून ते निसर्गाकडे बघत असतात. वेगळेपणाच्या शोधात ते कायम भटकंती करीत असतात. त्यांची अनेकांगी दृष्टी सतत काहीतरी नवीन शोधत राहते. त्यांच जीवन म्हणजे केवळ जंगल फिरणे, पक्षी आणि फुलपाखरे पाहणे इतकंच सीमित नसत. छंदवेड्या जीवणाची ही सुद्धा एक वेगळी तऱ्हा असू शकते. कारण जंगल म्हटलं की केवळ झाड, वन्यप्राणी आणि जैवविविधता इतकंच मर्यादित नसत. भारतीय संस्कृतीत पुराण, अध्यात्म, मंदिरे, गड, किल्ले, इतिहास आणि पर्यटन अशी जंगलाला एक वेगळी आणि स्वतंत्र बाजू देखील आहे. ती सुद्धा जंगलाकडेच जाणारी एक वाट आहे. आपलं आणि जंगलाच एकस्व सप्रमाण सिद्ध करणार हे एक व्यासपीठ आहे. याच व्यासपिठात अशी ध्येयवेडी माणस तल्लीन होऊन काम करीत असतात. जंगल, जैवविविधतेतून किल्यांकडे जाणारी त्यांची जीवनदिशा मग आपल्याला खुणावू पाहते. अमरावतीच्या डॉ. जयंत वडतकर यांच विश्वही असच आहे.

माझा गुरुबंधू म्हणुनही मी त्यांचा येथे आवर्जून उल्लेख करतोय कारण हा माझा निसर्गगुरुच आहे. ऐन उमद्या वयात महाविद्यालयीन जीवनात त्याची आणि माझी भेट झाली. जंगलात पायी फिरून जंगलाशी नात जोडण्याच बाळकडू मला यांच्या कडूनच मिळाल. न तुडविलेल्या रानवाटेचा हा अभ्यासक अतिशय मोचकं बोलतो. मनमौजी अन सतत रानवाटेत रमणारा डॉ. जयंत खरच त्यांच्या आयुष्यातही जयंतच आहे. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील बळेगाव सारख्या लहानश्या खेड्यात जन्मलेल्या या तरुणाची निसर्गगाथा आपल्याला मोहात पाडल्या शिवाय राहत नाही. संस्कारी आजोबांनी गावात वाचनालयाच्या रुपाने आणलेल्या गंगेत जयंत लहानपणीच बुडालेले असायचे. काही काळ कविता करून वृत्तपत्र लिखाणाची परंपरा पुढे वन्यजीव आणि इतिहास लेखनाकडे जाईल असेही कधी त्यांना वाटले नसावे. वडील सुधाकर आणि आई सरला तर लहान भाऊ अनंताच्या संगतीने या दिगंतसखा जयंताच आपलं एक विश्व फुलत गेलं. शुभांगी आणि सुषमा ह्या आपल्या दोन बहिणींना आपली पाखरामाया देत पुढे पुढे एक एक पल्ला तो गाठत गेला. पत्नी वर्षाच्या संगतीने आज डॉ. जयंत वडतकर यांच्या नावाचा वनवर्षाव पाहताना मला अतिशय आनंद होतो. डॉ. जयंत यांची उंच भरारीचा आता दिगंतालाही थांगपता लागणार नाही अशीच आहे.

आपली एक स्वतंत्र वाट धरून संयमाने काम कस करायचं याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जयंत वडतकर आहेत, जंगलात भटकणारी माणस केवळ जंगलच पाहतात. फार फार तर त्यांच विश्व वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी किंवा सरीसृप या मर्यादेत असतं. मात्र डॉ. जयंत हे पक्षी, फुलपाखरे याहीपलीकडे जाऊन इतिहास विषयात रुची घेतात. केवळ रुचीपुरतच विषय मर्यादित न राहता त्यावर ते पुस्तकही लिहतात. या धाटणीतले अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात आज विरळेच आहेत. केवळ वन्यजीव विषयात समरस न होता त्या बाहेरचही एक जग आहे. आणि हे जग माणूस आणि निसर्ग यांच नात जोडणार आहे. याचा नात्याच्या उलगडा आपल्याला इतिहासात सापडतो. म्हणूनच डॉ. जयंत वडतकर यांचा किल्यांविषयी असलेला अभ्यास आणि त्यांची आवड मला अतिशय महत्वपूर्ण वाटते. जंगलात भटकंती करतांना जंगलाच्या सर्वस्वाकडे बघणे आणि त्यातलं आपल्याला पाहिजे तितकं टिपत राहणे हा त्यांच्या स्थायीभाव येथे महत्वाचा ठरतो. डॉ. जयंत वडतकर हे गेल्या २२ वर्षापासून वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत. पक्षी अभ्यासक आणि किल्याचे अभ्यासक म्हणून ते आता महाराष्ट्राला परिचित आहेत. भटकंती हा त्यांचा आवडता छंद असून पक्षीनिरीक्षण, पदभ्रमण, गिर्यारोहण, किल्लेभ्रमण आणि संशोधन व वन्यजीवांचा अभ्यास आणि त्यांचे छायाचित्रण यासाठी ते अनेक ठिकाणी प्रवास करीत असतात. सन २००४ ते २००८ दरम्यान त्यांनी मेळघाट तसेच सातपुड्यात वन्यजीव अभ्यास व फुलपाखरांवरील संशोधनासाठी फिरताना किल्ल्यांचा अभ्यास करून ‘सातपुड्यातील किल्ले’ हे पुस्तक लिहिले. त्यांची आजवर एकूण ५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी सातपुड्यातील फुलपाखरावर संशोधन करून पर्यावरणशास्त्र या विषयात आचार्य पदवी देखील प्राप्त केली आहे. एकूण ५० शोध निबंधासह त्यांचे आजवर ३०० हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. सध्या ते ‘विदर्भातील गड किल्ले आणि मंदिरे’ यावर अभ्यास व माहितीचे संकलन करीत आहेत. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे ते अशासकीय सदस्य असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सुद्धा आहेत. अमरावतीचा एक पक्षीमित्र ते थेट महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष असा त्यांचा प्रवास मला प्रेरनादायी आहे. जंगल आणि इतिहास अश्या वेगळ्या समीकरणाचा श्रीगणेशा हा त्यांच्यामाध्यमातून होतो आहे हे विशेष…..!

@ यादव तरटे पाटील

     दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

     disha.wildlife@gmail.com

     www.yadavtartepatil.com

2 thoughts on “अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर”

  1. Really very very inspiring for new generation.
    Actually, we people took more from nature and given less.
    All of you are angel to save the life of human being.
    My sincere thanks,
    Digambar Mahajan,
    Reed. Mech. Engineer, pad,
    Lead Assessor, ISO 9001, 14001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *