Categories: ArticleForestNature

वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, ग्रामवासी व नगरवासी असी त्रिस्तरीय वस्तीव्यवस्था निर्माण झाली. यातच मानवप्राणी आपल्या बुद्धीनुरूप इतर सजीवांवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. कालांतराने खेडी व शहरे निर्माण झाली. निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसर्गापासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पर्यायाने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. अन्नजाळे व अन्नसाखळी सुध्दा कमालीची प्रभावित झाली. काही सजीव नष्ट झालेत तर काही नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. मानव व वन्यप्राण्यांच्या सह्जीवनाचा हा प्रवास विनाशाच्या उंबरठ्याकडे जातोय ही अनुभूती व्हायला लागली अन माणसांना उशिरा का होईना शहाणपण सुचले. संभावित धोके ओळखून मानव व वन्यजीवन यांच्या सहजीवनाचे महतवा नव्याने पेरण्याची आज गरज निर्माण झाली. माणसाला अनुभूती झाली की, ‘वन्यजीवन जगले तरच आपलं अस्तित्व राहणार’ सबब ‘वन्यजीव संवर्धन काळाची गरज’ असा सूर आवळायला सुरवात झाली. खर तर आपणच आपल्या संवर्धनासाठी उचलेले हे पाउल आहे. यातूनच भविष्यातील ‘दीन’ परिस्थिती टाळण्यासाठी ‘दिन’ व ‘सप्ताह’ साजरे करण्यास सुरवात झाली. म्हणूनच ऑक्टोबर महिन्याचा पहिल्या आठवड्याचं ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून बारसं करण्यात आलं.

आज वन विभाग, स्वयंसेवी संस्था व निसर्गप्रेमी ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा करीत आहेत. महाराष्ट्रात १ ते ७ ऑक्टोबर या काळात साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सर्व सहभागी झाले आहेत. मात्र सामान्य माणूस आजही यात कुठेच सक्रीय दिसत नाही. तसंही मानव आणि वन्यप्राणी यांचा संबंध कमी कमी होत चालला आहे. हा संबंध आता फक्त मानव-वन्यजीव संघर्षापुरताच उरला आहे. भारतातील केवळ हती व मानव संघर्षाच्या विचार करता, सन २०१४ ते २०१७ या चार वर्षात एकूण ७८,६५६ इतक्या संघर्षाच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल १०० हून अधिक हतींचा बळी गेला. वाघाच्या बाबतीत ३०० हून अधिक घटना घडल्या. महाराष्ट्रातील एकट्या नाशिक नाशिक वनविभागाचा विचार करता गेल्या १९ वर्षात ३० नागरिक मृत्यू, ९८ जखमी, तर ४६१६ एकूण हल्ल्याच्या घटना घडल्या. पाळीव प्राणी हल्ल्यात ५८२७ प्राणी जखमी झालेत. यासाठी नाशिक वनविभागाने ३ कोटी ७० लाखाची भरपाई दिली. सन २०११ ते २०१७ दरम्यान एकट्या महाराष्ट्रात २ लाखाहून अधिक मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या. यासाठी शासनाचा अंदाजे ४० कोटी खर्च झाला. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव भागात वाघिणीने केलेल्या हल्यात १४ लोक मृत पावले. तर दुसरीकडे वाढती शिकार, अधिवास अवनती व ऱ्हास आणि जंगलतोडीमुळे भारतातील वाघांची संख्या केवळ २२०० इतकीच शिल्लक राहिली. वास्तविकतः १९ व्या शतकाच्या सुरवातीला भारतात चाळीस हजाराहून अधिक वाघ होते. गेल्या शतकात ९७% इतकी व्याघ्रसंख्येत झालेली घट चिंताजनक आहे. केवळ वाघ, बिबट, हत्ती अश्या मोठ्या प्राण्यांचाच यात विचार होतो. पक्षी, साप, फुलपाखरे व कीटक यांचा तर अजून विचारही झाला नाही.

सन १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला. नुकताच माळढोक पक्षी महाराष्ट्रातून नामशेष झाल्याचे वृत्त आले. तिकडे सारस पक्ष्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. वाघ ते वाळवी दरम्यान प्रत्येक सजीव कमीअधिक प्रमाणात संकटात सापडला आहे. वन्यप्राणी अधिवास अवनती व ऱ्हास, वन्यप्राण्यांनी मनुष्यवस्त्यावर येऊन अतिक्रमण केलय की माणवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय? याचा विचार आपणच या निमित्ताने करुया. हा संघर्ष कमी करणेसाठी नक्की काय करावे याचा उहापोह अश्या वन्यजीव महोत्सवातून होणे अपेक्षित आहे. हारतुरे, कार्यक्रम, छायाचित्रे, भित्तीपत्रके, फेऱ्या व बातम्या यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम होण्याची गरज आहे. जिथे वाघ आहेत तिथे जनजागृती व स्थानिकांचा वास्तववादी सहभाग वाढविणे गरजेचे आहे. पृथ्वीवर जसा मानवाचा अधिकार आहे तशीच पृथ्वी वन्यप्राण्यांची सुद्धा आहे हा शाश्वत विचार आपल्या विद्यार्थी व युवा पिढीमध्ये रुजविण्यात आपण हातभार लावणे गरजेचे आहे. अति वनपर्यटनाचा त्रास वन्यजीवाना होऊ नये यासाठी कडक नियम व त्यांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. मानव आणि वन्यप्राणी यांचे शक्य असलेले सहजीवन अपेक्षित आहे. शतकोटी वृक्षलागवड योजना व हरित सेनेची होत असलेली संख्यात्मक प्रगतीची वाटचाल शाश्वत प्रगतीकडे होईल यासाठी प्रयत्न करुया. आपल्या संस्कृतीत म्हणूनच अनेक प्राणी व पक्ष्याचा उल्लेख आहे. संवर्धन हा उद्देश ठेऊन आपल्याशी प्राणी व पक्षी जोडल्या गेलेत. म्हनुणच वन्यजीव संवर्धनाच्या विचाराची पेरणी आपण आपल्या मनात करुया. आपले मित्र, नातेवाईक व विद्यार्थी यांच्याशी असलेले निसर्गाचे नाते पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी या वन्यजीव सप्ताहापासून सुरवात करूया.

@ यादव तरटे पाटील 

दिशा फाउंडेशन, अमरावती

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

3 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

3 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

3 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago